शुक्रवार, १४ मे, २०२१

शून्य सावलीचे दोन दिवस

१५ मे व २८ जुलै हे मुंबईसाठीचे शून्य सावलीचे दोन दिवस. त्या निमीत्ताने शून्य सावलीची माहिती देणारा हा लेख  

शून्य सावली ? म्हणजे नक्की काय ? व ती असते तरी कधी असा प्रश्न कधी आपल्याला पडलाय का ? पडला असो अथवा नसो, याची माहिती जाणून घ्यायला काय हरकत आहे ?

आपल्याला माहीत आहेच कि पृथीचा अक्ष सूर्यसापेक्ष २३-१/२ अंश कललेला आहे. याचमुळे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमण मार्गातील घटना आपल्याला पाहायला मिळतात. ऋतू हि त्यातीलच एक घटना. त्याचबरोबर या कलामुळे आपल्याला सूर्य रोज वेगवेगळ्या वेळी उगवताना व मावळताना दिसतो. 

सूर्य वर्षभरात कर्कवृत्त व मकरवृत्त या दोन काल्पनिक रेखावृत्ताच्या मध्ये घुटमळत असतो. त्यामुळे या दोन रेखावृत्तांच्या मधील प्रदेशातील लोकांच्या तो कधी ना कधी डोक्यावर येतो. वर्षातील २ दिवस असे घडते व त्यामुळे वर्षातील या दोन दिवसात सूर्य डोक्यावर असताना तुमची सावली पडत नाही अथवा शून्य होऊन जाते व या २ दिवसानाच तुमचे (त्या स्थानाचे) शून्य सावलीचे दिवस म्हटले जाते.  तुम्ही ज्या अक्षांशावर राहता त्यावर हे स्थान बदलत जाते. पण जर तुम्ही २३-१/२ अंशाच्या पलीकडे उत्तरेकडे अथवा दक्षिणेकडे गेलात तर सूर्य तुमच्या बरोबर माथ्यावर कधीच येणार नाही व प्रत्येक वेळी तुम्हांला सूर्याची सावली पाहायला मिळेल. आपण आता आकृतीच्या साहाय्याने हि घटना समजावून घेऊ व महाराष्ट्रात असे शून्य सावलीचे दिवस कुठे व कधी असतात हे देखील पाहू.

पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेतील भ्रमणमार्गावर आपल्याला या कलाच्या परिणामामुळे दिसणारे काही ठळक काल्पनिक बिंदू दाखवता येतात ते म्हणजे सूर्याचा उत्तरेकडे प्रवास सुरु होतो तो दिवस उत्तरायण बिंदू (Winter Solstice )  म्हणून दर्शविता येतो. २१ डिसेंबरच्या या दिवशी सूर्य आपला दक्षिण गोलार्धाच्या त्याच्या अंतिम बिंदुला स्पर्श करून मागे वळतो व उत्तरेच्या बाजूने आपला प्रवास सुरु करतो. यानंतर पृथ्वी लगेचच आपल्या लंबगोल कक्षेतील सूर्याच्या सर्वात जवळच्या बिंदूपाशी म्हणजे उपसूर्यस्थानी  (३ जानेवारी) येते. पुढे २१ मार्चला सूर्य आपल्याला विषुववृत्तावर आलेला दिसतो या बिंदुला आपण शरद संपात (Autumnal Equinox ) बिंदू म्हणून ओळखतो. 

यापुढे सूर्याचा प्रवास उत्तर गोलार्धात सुरु होतो व तो २१ जुन पर्यंत सुरु राहतो. हा आपला दक्षिणायन बिंदू (Summer Solstice ). या ठिकाणी सूर्य पुन्हा २३-१/२ अंश उत्तरेकडे आलेला असतो व आपला दक्षिणेकडचा प्रवास सुरु करतो. ३ जुलैच्या सुमारास पृथ्वी सूर्याच्या कक्षेतील दूरच्या बिंदूपाशी म्हणजे अपसूर्यस्थानी असते.  २३ सप्टेंबरला वसंत संपात (Vernal Equinox ) या विषुववृत्तीय बिंदूपाशी येऊन सूर्य आपला दक्षिण गोलार्धातील प्रवास सुरु करतो. 

या सर्व प्रवासात सूर्यकिरणांचा  पृथ्वीवरील येणारा कोन बदलत राहतो व सूर्य आपल्यासापेक्ष कोणत्या ठिकाणी उगवतो ते ठिकाण देखील. उन्हाळ्याच्या दिवसात सूर्य उत्तर गोलार्धात असतो म्हणून तो उत्तरेकडे उगवतो दोनवेळा जेव्हा तो विषुववृत्तीय बिंदूपाशी येतो तेव्हा तो बरोबर पूर्वेकडे व दक्षिणेकडे जाताना आपल्याही दक्षिण बाजूला उगवताना दिसतो. जर आपण एकाच ठिकाणी उभे राहिलो तर आपल्याला दरदिवशीचा सूर्योदय वेगवेगळ्या ठिकाणी झालेला दिसेल.


मुंबईवरील शून्य छायेची स्थिती - १५ मे
या सर्व प्रवासात एखाद्या अक्षांशावर राहणाऱ्या व्यक्तीच्या तो २ वेळा डोक्यावर येईल (फक्त +/- २३-१/२ अंशाच्या मध्ये राहणाऱ्यांच्या). या वेळा गणिताच्या साहायाने ठरविता बरोबर ठरवता येऊ) भारतातला बराच भाग व महाराष्ट्रातील सर्व भाग यात येत असल्याने या लेखासोबत महाराष्ट्रात या घडण्याचे दोन दिवस सोनाच्या चित्रात दाखविले आहेत. मुंबईसाठी हे दोन दिवस १५ मे  व २८ जुलै असे आहेत. मुंबईच्या दक्षिणेकडे असलेल्या कोकण, पुणे या भागांसाठी यातील एक दिवस आधी तर एक दिवस नंतर यतो पण हा नंतरचा दिवस पावसाळ्यातील असल्याने आपल्याला सावली लक्षात येत नाही. 
या दोन दिवशी जेव्हा दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर येईल तेव्हा आपली सावली पडणार नाही. इतर दिवशी मात्र कोणत्याही वेळी आपली सावली पडल्याचे आपल्याला आढळून येईल. 

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

पहिला मराठी महिना - चैत्र

चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपलं  मराठी नवं वर्ष सुरु होतं. इंग्रजी वर्ष थाटामाटात साजरं  करणारे आपण मात्र आपल्याच नववर्षा बद्दल अनभिज्ञ असतो. आपलं हजारो वर्षांपासून अव्याहतपणे कालगणना करणारं कॅलेंडर, त्याची  शास्त्रशुद्धता,  याबद्दल आपल्याला अजिबात माहिती नसते व ती करून घ्यायची फारशी इच्छाही नसते. नववर्षाच्या शुभेच्छांसह, आजचा हा  प्रपंच याची थोडक्यात ओळख करून देण्यासाठीचा.

आपली कालमापन पद्धती अत्यंत प्राचीन असून इतर संस्कृतींना कदाचित माहित नसाव्यात अशा गोष्टींचे उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. अजूनही रूढ असलेले मराठी महिने, हि आपली गेल्या सुमारे ५००० वर्षांपेक्षा जुनी  कालदर्शनाची पद्धत. मात्र यात कोणत्याही एका शकाचा किंवा घटनेचा प्रारंभबिंदू म्हणून उल्लेख सापडत नाही. त्याचबरोबर आपली कालमापनाची पद्धत चंद्राच्या कलांशी निगडित होती व म्हणूनच आपले महिने चंद्राच्या कलांशी जोडलेले आहेत. असे असले तरी त्याची सांगड सण  व ऋतु यांच्याशी घालण्याकरिता अधिक मास पद्धतीचा अवलंब करून आपण त्याचं  नातं सौर वर्षाशी देखील  जोडलं आहे. आतादेखील आपले कॅलेंडर चांद्र-सौर अथवा Lunisolar प्रकारचे आहे व अगदी अचूक देखील आहे. 

चंद्र आणि सूर्य आकाशातील एका ठराविक मार्गावरून भ्रमण करतात हे आपल्या पूर्वजांचे निरीक्षण होते. व या मार्गाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या ताऱ्यांचे आकार ठरवून , त्यांचे २७ विभाग करून , या तारका समूहांना नावे देण्याचे काम, पाश्चात्यांच्या फार पूर्वीच करण्यात आले होते. व म्हणूनच किमान ५००० वर्षांपूर्वीचा इतिहास असे मानल्या गेलेल्या महाभारतात आपल्याला ज्योतिःशास्त्राशी (जोतिष नव्हे) संबंध जोडता येईल असे किमान ३०० श्लोक आढळतात. यातील तारका, नक्षत्रं  व ग्रहांच्या स्थितीच्या वर्णनावरून महाभारताची कालनिश्चिती करण्याची चढाओढ बऱ्याच खगोल अभ्यासकांमध्ये व संशोधकांमध्ये लागलेली आहे. 

राशी हि मात्र पूर्णपणे पाश्चात्य संकल्पना आहे. आजच्या व्यवहारात आपण राशी हि संकल्पना वापरत असलो तरीदेखील मराठी महिने मात्र नक्षत्र संकल्पनेवर ठरतात. कसे ते आता आपण थोडक्यात पाहू.

मराठी नक्षत्रे 
आयनिक वृत्तावरील (चंद्र व सूर्य यांच्या भ्रमणमार्गाच्या पार्श्वभूमीवरील तारकामार्ग) मार्गात असलेले २७ तारकासमूह नक्षत्र या संज्ञेने ओळखले जातात. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

(१) अश्विनी 

(८) पुष्य 

(१५) स्वाती

(२२) श्रवण 

(२) भरणी 

(९) आश्लेषा 

(१६) विशाखा

(२३) धनिष्ठा 

(३) कृत्तिका

(१०) मघा 

(१७) अनुराधा

(२४) शततारका

(४) रोहिणी

(११) पूर्वाफाल्गुनी 

(१८) जेष्ठा

(२५) पूर्वाभाद्रपदा

(५) मृगशीर्ष

(१२) उत्तरा फाल्गुनी

(१९) मूळ

(२६) उत्तराभाद्रपदा 

(६) आर्द्रा 

(१३)हस्त

(२०) पूर्वाषाढा

(२७) रेवती

(७) पुनर्वसू 

(१४) चित्रा

(२१) उत्तराषाढा



यातील पौर्णिमेचा चंद्र ज्यावेळी ज्या महिन्यात ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्राचे नाव त्या महिन्याला देण्यात येते.म्हणजेच गुढी पाडवा ज्या चैत्र महिन्यात येतो त्या महिन्यात पौर्णिमेचा चंद्र चित्रा या नक्षत्राच्या जवळ असेल व ते दृश्य असे दिसेल. 
चैत्र पौर्णिमा - चित्रा नक्षत्राजवळ चंद्र
हा महिना प्रतिपदेपासून सुरु होतो. म्हणजेच १५ दिवस आधी झालेल्या अमावास्येला चंद्र व सूर्य हे पृथ्वीच्या एकाच बाजूला म्हणजेच एकाच नक्षत्रात असतील. या दिवशीची हि रास, चित्रा नक्षत्र ज्या राशीत आहे त्या कन्या  राशीच्या साधारणपणे १८० अंश असेल.  म्हणजेच सूर्य अश्विनी नक्षत्रात अथवा मेष या राशीत असल्याचे आपल्या लक्षात येईल. सोबतच्या चित्रात दर्शविलेल्या रचनेवरून हे अधिक स्पष्ट होईल. 

म्हणजेच चैत्र या आपल्या पहिल्या महिन्यातच सूर्याचे मीन या शेवटच्या राशीतून मेष या प्रथम राशीत संक्रमण होत असते हे  आपल्या लक्षात येईल. 

याच क्रमाने आपण पुढे गेलो तर आपल्याला चैत्र नंतर वैशाख (विशाखा) , जेष्ठ (जेष्ठा), आषाढ (पूर्वाषाढा-उत्तराषाढा), श्रावण (श्रवण), भाद्रपद (पूर्वा व उत्तराभाद्रपदा) , आश्विन (अश्विनी) , कार्तिक (कृत्तिका) , मार्गशीर्ष (मृगशीर्ष), पौष (पुष्य), माघ (मघा) व फाल्गुन (पूर्वा व उत्तरा फाल्गुनी) असे १२ महिने मिळतात. कंसात दर्शविलेली नक्षत्रांची नावे त्या महिन्याच्या पौर्णिमेचा चंद्र साधारणपणे कोणत्या नक्षत्राजवळ असतो ते दर्शविण्यासाठी आहेत. 

अशावेळी आकाश निरीक्षणासाठी आपल्याला काय सोईचे ठरेल ? सूर्य ज्या राशीत प्रवेशतो ती रास तर आपल्याला निश्चितच पाहता येणार नाही,  मात्र त्याचवेळी १८० अंशावर असणारी रास (अथवा ते नक्षत्र ) आपल्याला निश्चितच छानपणे आपल्याला अगदी डोक्यावर पण दिसू शकेल. आणि मग ते ओळखाल कसे ?

यासाठी आपण या नक्षत्रांचे आकार हळू हळू जाणून घेऊ. काही गोष्टींचा उपयोग करून ते लक्षात ठेवू व त्यांच्या आजूबाजूचे तारकासमूहांचे आकार पण त्यांच्या गोष्टीत गुंफून जोडू म्हणजे हळूहळू सर्व आकाश आपल्या कह्यात येऊ लागेल. 

तसेच चांद्र वर्ष व सौर वर्ष याचा मेळ कसा घातला जातो हेदेखील वेगळ्या लेखातून आपण पाहू.